मंगळवार, १ डिसेंबर, २००९

आज दत्त जयंती!


श्री गुरुदेव दत्त

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २००९



२६ नोव्हेंबरच्या भ्याड
आतंकवादी हल्ल्यात धारातिर्थी
पडलेल्या वीरांना लक्ष लक्ष प्रणाम.

रविवार, १ नोव्हेंबर, २००९

बुधवार, २१ ऑक्टोबर, २००९

सुरूवात

कुठून सुरूवात करावी हेच सुचत नाही
कारण वाळवंटात रस्ता कधी दिसत नाही

तु रणातील मृगजळ
मी तहानलेलं हरीण
शोधतोय केव्हाचा तुला
पळतोय तुझ्याच कडे

अशी जाऊ नकोस लांब गं
फक्त तुझ्याचसाठी आलोय सोडून
ते दंडकारण्य, तो मायेचा झरा
तुझ्यासाठी त्यागलाय मी संसार सारा

दिसतेस तु मला अगदी समोरचं
दिसतोय आता शेवट पण, पण...
कुठून सुरूवात करावी हेच सुचत नाही
कारण वाळवंटात रस्ताच कधी दिसत नाही

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २००९

शुभ दीपावली!


आपणा सर्वांना दिवाळीच्या

लाख-लाख शुभेच्छा!

सोमवार, १२ ऑक्टोबर, २००९

मनं माझे...

जेव्हा जेव्हा मी एखादी ओवी अथवा कडवे वाचतो तेव्हा तेव्हा आपसुकच त्यांत स्वतःचे प्रतिबिंब पाहण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या आदर्शांत स्वतःचे स्थान शोधतो, तसेच यथाशक्ती त्यांना आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. पण का कोण जाणे प्रत्येक वेळी मला वाटते की कोठे तरी काहीतरी चुकत आहे. ज्या गोष्टींना आदर्श मानत असतो त्यांतच गुरफटून जातो. येतात त्या केवळ वेदना! खरेच का आदर्शांना धरून अथवा आचरणात आणून यश मिळवता येते, प्रगती करता येते? आजुबाजुच्या जगात डोकावल्यास लांडी-लबाडी करणारा तर तुपाशी खातो आहे! जेव्हा जेव्हा वाटते की टाकून द्यावे हे सतीचे वाण तेव्हा तेव्हा मनात वसलेला आदर्शवाद उफाळून येतो, पुन्हा मीच स्वतःविरुद्ध बंड करतो पुन्हा एकदा हेच आदर्शवाद रुपी शिवधनुष्य उचलण्यास समर्थ होतो.

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २००९

छोटीशीच पण गोष्ट!

सात वर्षांच्या अर्नवला गणिताची शिक्षिका एक गणित समजावून सांगत होती - "जर मी तुला एक सफरचंद दिले, अजून एक सफरचंद दिले आणि अजून एक सफरचंद दिले तर तुझ्याजवळ एकून किती सफरचंद असणार?" थोडा वेळ विचार करून अर्नव म्हणाला -"चार!" पण तिला हे उत्तर अपेक्षित नव्हते. तिला वाटले की त्याने निटसे ऐकले नसावे म्हणून ती म्हणाली - "अर्नव नीट लक्ष देऊन ऐक. जर मी तुला एक सफरचंद दिले, अजून एक सफरचंद दिले आणि अजून एक सफरचंद दिले तर तुझ्याजवळ एकून किती सफरचंद असणार?" अर्नव त्याच्या शिक्षिकेच्या चेहर्‍यावरील राग - आगतिकता पाहत होता. त्याने परत आपल्या हातांच्या बोटांद्वारे आकडेमोड केली. त्याला मुळात बरोबर उत्तराशी काही देणे-घेणे नव्हते. त्याला तर त्याच्या बाईंचा चेहरा हसरा पहायचा होता! यावेळी त्याने जरासे अडखळतच उत्तर दिले - "अं......चार."
त्याने तीच आगतिकता आपल्या बाईंच्या चेहर्‍यावर पाहिले, त्याला देखील वाटले काही तरी चुकत आहे. मग त्या शिक्षिकेलाच वाटले की याला सफरचंद आवडत नसावेत, त्यामुळे तिने तोच प्रश्न जरा फिरुन विचारायचे ठरवले - "बर आता ऐक, जर मी तुला एक स्ट्रॉबेरी दिले, अजून एक स्ट्रॉबेरी दिले आणि अजून एक स्ट्रॉबेरी दिले तर तुझ्याजवळ एकून किती स्ट्रॉबेरी असणार?" यावेळी त्याने तिच्या चेहर्‍यावरील राग थोडासा मावळेला पाहिला, त्याने परत हाताची बोटे मोजली. इकडे ती मात्र चिंतेत होती कि या वेळी तर हा बरोबर उत्तर देईल की नाही! बळीचे उसने अवसान आणून अर्नव म्हणाला - ".......तीन?" या उत्तराने झालेलेचे तिचे समाधान पाहून त्याला देखील हुरूप आला. आता परत तिने विचारले - "तर आता सांग, जर मी तुला एक सफरचंद दिले, अजून एक सफरचंद दिले आणि अजून एक सफरचंद दिले तर तुझ्याजवळ एकून किती सफरचंद असणार?" अर्नवने लगेच उत्तर दिले - "चार!" तीने रागानेच विचारले - "अरे बाबा चार कसे असेल रे.......!" अर्नवने भित - भित सांगितले - "कारण टीचर माझ्या बॅग मध्ये आधिच एक सफरचंद आहे."

जर कोणी तुम्हाला अपेक्षित उत्तरापेक्षा वेगळे उत्तर देत असेल तर ते चुकीचे आहे असा गैरसमज करून घेऊ नका. त्याच्या द्रुष्टीकोनातून तेच बरोबर असेल. तर जर तुम्हाला कोणाला समजून घ्यायचे असेल तर त्याच्याविषयीचे पुर्वग्रह बाजुला सारा. तसेच स्वतःच्या समजूती जराशा बाजुला सारून जरा समोरच्याच्या नजरेने देखील जग पहा. कदाचित तुम्हीच चुकीचे असू शकाल पण जर तुम्हाला वाटत असेल की आपण खरेच बरोबर आहोत तर त्याला त्याची चुक अवश्य दाखवून द्या.
--------------------------------------------------------------------------
मुळात ही गोष्ट मला मेलद्वारे आलेली आहे, मनाला भावली म्हणून इथे टाकली. तिच्यात मुळ लेखकाचे नाव दिलेले नाहीये. जर कोणाला माहीत असल्यास अवश्य कळवा.

गुरुवार, १ ऑक्टोबर, २००९

विडंबन

--------------------------------------------------------------------------
परवा रद्दी आवरत असता रद्दीत ९ ऑगस्ट चे सप्तरंग हातात आले. त्यावरच
मी एक विडंबन लिहीले होते. "चांदोबा चांदोबा भागलास का?" चे! आज
पाठवू उद्या पाठवू असा कंटाळा करून पाठवचेच विसरून गेलो.
तेच विडंबन इथे टंकवत आहे.
--------------------------------------------------------------------------

मंत्रीबुवा मंत्रीबुवा दमलात का?
चमच्यांच्या गराड्यात दडलात का?

चमच्यांचा गराडा आनंदी
प्रजेचा सेवक स्वच्छंदी

जरासा इकडे येऊन जा
प्रजेचे हाल ऐकून जा

आश्वासनांच्या मोठाल्या राशी
मंत्रीबुवा प्रजेला ना पुशी

----बाळराजे

सोमवार, २८ सप्टेंबर, २००९

आपणा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!




साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानल्या

गेलेल्या दसर्‍यानिमित्त

आपल्या सर्वांना मनःपुर्वक शुभेच्छा !

शनिवार, २६ सप्टेंबर, २००९

राणीची झोप

आज का कोणास ठाऊक पण सहजच एक गोष्ट आठवली. अगदी लहान असताना ऐकलेली. आजोबांनी सांगितलेली - त्यांच्याच कुशीत बसून ऐकलेली. ती गोष्ट आहे राणीची झोप. आजोबा अशा काही प्रकारे गोष्टी सांगायचे की ऐकणारी आम्ही पोरं तल्लीन होऊन जात असू. वरवर पाहता अगदी साध्या होत्या त्या. मुळातच आजोबा खेड्याचे त्यामुळे गोष्टीही तश्याच अगदी साध्या. पण का कोण जाणे जसजसे आम्ही मोठे होत गेलो त्या गोष्टींचे असंख्य पैलू नजरेस येत गेले; एक एक गोष्ट जणु असंख्य पैलू पाडलेले हिरेच! त्या रात्री आजोबांनी सांगितलेली राणीची ती गोष्ट अजूनही आठवते.
एक राणी होती. राजाची सर्वांत लाडकी. पण राजा त्या राणीबद्द्ल खुप चिंतेत होता; कारण त्या राणीला रात्री झोपच येत नसे, जरा झोपण्याचा प्रयत्न केला की उशी किंवा गादी तिला टोचत असे. राजाने सर्व प्रयत्न केले पण काही निष्पन्न झाले नाही. न राजाला न प्रजेला कळत होते की राणीच्या त्रासाचे कारण तरी काय आहे. राजाने राणीसाठी खास मोरपिसी गादी बनवली पण पण ती देखील तिला टोचत होती. नंतर राजाने खास राणीसाठी गुलाबांची गादी बनवली पण त्या गादीच्या अगदी खालील बाजूस असलेल्या गुलाबाचा एक छोटासा काटा तिला टोचत होता. राजाला कळेना की काय करावे. एके दिवशी राजाच्या दरबारात एक विद्वान आले त्यांनी राजाला सांगितले की, "हे राजा मी तुझ्या राणीच्या त्रासाचे कारण हुडकून काढले आहे". हे ऐकून राजा खूप खुश झाला. पण त्या विद्वानाने एक अट घातली की तो जे सांगेल ते राजाने केले पाहिजे. यांस देखील राजा तयार झाला. ठरल्याप्रमाणे एके दिवशी राणीने वेशांतर केले. राणीला असे सांगण्यात आले की संध्याकाळ होताच पहारेकरी आपणांस महालात परत आणतील तोपर्यंत आपण प्रजेत राहून तिचे हाल-हवाल जाणून घ्यावे. राणी त्या दिवशी एकटीच राज्यात फिरली पण का कोणास ठाऊक पण रात्र होत आली परंतु महालातून कोणी तिला घेऊन जाण्यास आलेच नाही. राणी तशीच महालाकडे जात असता तिला एका म्हातारीने हटकले, विचारले "कुठं चाललीस पोरी?". राणीने सांगितले, "राजवाड्यात". म्हातारी म्हणाली, "राजवाडा तर संध्याकाळीच बंद झाला आणि सकाळशिवाय उघडणार नाही". हे ऐकून राणी फार चिंतेत पडली. ते पाहून म्हातारी म्हणाली, "असं कर पोरी आज माझ्या झोपडीत निज आणि उद्या सकाळी जा त्या राजवाड्यावर". राणीने होकार दिला. राणी तिच्या मागे चालू लागली. काही अंतरावरच म्हातारीची छोटीशी झोपडी होती. झोपडीत जाताच म्हातारीने तवा टाकून दोन गरम गरम भाकरी बनवल्या प्रत्येकीवर ठेच्याची चिमूट ठेवली एक स्वतः खाल्ली व एक राणीला दिली. दिवसभर हिंडल्याने राणीला देखील खूप भूक लागली होती त्यामु़ळे तिने ती ठेचा-भाकर आवडीने खाल्ली. नंतर म्हातारीने अंथरुण टाकले - अंथरुण कसले तर एक फाटकी गोधडी! राणी त्या रात्री त्या गोधडीवरच निजली. का कोण जाणे पण आज राणीला काही टोचत नव्हते. काही वेळातच राणीला गाढ झोप लागली. दुसर्‍या दिवशी सकाळी राणी परत राजवाड्यात गेली. तिने राजाला सर्व हकीकत सांगितली. राजाला अजून देखील कळत नव्हते की राणीच्या त्रासाचे कारण काय? त्याने राणीने सांगितलेली सर्व हकीकत त्या विद्वानाला सांगितली व त्याला याचे कारण विचारले. त्यावर विद्वान म्हणाला की, "राजन राणीला मुळात गादी टोचत नव्ह्ती तर तिला सभोवतालचे सुख टोचत होते".
खरे सांगायला गेल्यास त्याकाळी आम्हाला या गोष्टीचे ओ की ठो कळले नव्हते. पण आज ज्या ज्या वेळेस आजोबा आठवतात त्या त्या वेळेस त्यांच्या उबदार कुशीत बसून ऐकलेल्या गोष्टी आठवतात. पुर्ण आठवत असतीलच असे नाही तुटक-तुटकच आठवतात. पण त्या गोष्टींचे प्रत्येक पैलू दिवसागणिक नजरेस पडत जातात व त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळेस मनात एक नवीन घर करून जाते. आज आजोबा नाहीत पण त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्याकाळी न कळलेल्या व आज कळून चुकलेल्या अर्थांसकट आजोबांची तिच प्रेमळ, उबदार कूस देऊन जाते.

मंगळवार, २२ सप्टेंबर, २००९

'पट्टे' पुराण!


काल मी, राहूल आणि शंकर सलमान खानचा "वाँटेड" पहायला गेलो होतो. तिकीट वगैरे घेतल्यानंतर चित्रपट चालू होण्यास अजून बराच वेळ असल्याने आम्ही बाहेरच गप्पा मारत थांबलो होतो.
"तुला एक गंमत सांगायचीय !" - शंकर अचानक मध्येच म्हणाला.
तेव्हढ्यात राहूलने त्याच्यावर दोन-तीन स्तुतीसुमने(!) उधळली.
"काय भानगड काय आहे ?" - मी
"काल राहूलने बेल्ट घेतलाय - नवीन !"
"मग" - मी
आता तर राहूल त्याच्यावर धावूनच गेला. वाटले, खरीच काहीतरी भानगड आहे.
एकतर आम्हाला दुसर्‍यांच्या भानगडीत खुपच 'इंट्रेष्ट' आणि त्यात ती जर राहूलची असेल तर 'बात छोड'!
मी राहूलला आवरले.
शंकरने सुरुवात केली - "काल राहूलने नवीन बेल्ट खरेदी केलाय !"
"मग" - मी
"राहुल्या दाखव बे !" - शंकर
राहूलने सुटलेल्या पोटासहीत त्याचा तो 'नवीन' पट्टा दाखवला.
"चांगला तर आहे की ?" - मी
"गेस कर किंमत काय असेल ?" - शंकर
मी - "असेल ६०-७० रुपये..."
शंकरने डोक्याला हात लावला!
"मग पन्नास !" - मी
राहूल गालातल्या गालात हसला!!
"का काय झाले ?" - मी
"हट! चाळीसचा आहे तो !!" - इति शंकर
"मग...." - मी
शंकर - "काल मी आणि राहूल्या त्याच्यासाठी पट्टा खरेदी करायला गेलेलो होतो. ह्याने तब्ब्ल १० - १५ पट्टे पाहिल्यानंतर हा घेतला. त्याने किंमत सांगितली '४० रू.' आणि राहूल्या 'पन्नास रूपयाला देत असाल तर घेतो!' दुकानदार - 'जमत नाही साहेब चाळीसला घ्यायचा असेल तर घ्या!' पण हा काही पन्नाशी सोडेना आणि तो चाळीशी! हा मुर्ख आणि तो महामुर्ख!! तरी मी सांगितलं 'राहूल्या तीसला माग बे ......!' हा मात्र त्याच्याशी हुज्जत घालू लागला. थोड्या वेळाने त्या दुकानदारचीच ट्युब पेटली; त्यानं शेवटी ह्याला पन्न्न्नास रूपयाला पट्टा विकला आणि जाताना आम्हाला न विसरता म्हणाला 'या परत!!' "
बाकीचे ऐकण्याआधीच राहूल चित्रपटगृहात शिरला!
मागून शंकर ओरडत होता - "द ग्रेट बारगेनर, राहूल महाराज की..........."
"जय!" - मी

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २००९

कारण....

हरलेली लढाई
आज पुन्हा लढणार आहे

गंजलेली तलवार
आज पुन्हा म्यानातून काढणार आहे

तिचे
त्याचे
आपल्यांचे
परक्यांचे
माणसांचे
आणि 'जना'वरांचे

शब्दांचे वार
नि:शब्द वार
कोमल वार
कठोर वार
सरळ वार
वाकडे वार
नुसतेच वार
पण वार

आज पुन्हा परतवणार आहे
कारण....
हरलेली लढाई
आज पुन्हा लढणार आहे

बुधवार, ९ सप्टेंबर, २००९

हिटलरची अनौरस पोरं

मुळात नाझी जर्मनीतील ज्यु लोकांवर झालेल्या अत्याचाराला आणि नाझी छळछावण्यांना खुप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाल्याने त्या काळातील भरमसाठ बाबी दुर्लक्षितच राहिल्या. ज्युंचा झालेला संहारच इतका भयंकर होता की तत्कालीन मुलांच्या स्थितीबद्द्ल भाष्य करण्यात तसेच संशोधनास आपसुकच दुर्लक्ष झाले.

दुस
र्‍या महायुद्धामुळे नाझी जर्मनीतील तसेच इतर राष्ट्रांतील मुलांचे बालपण या ना त्या कारणाने होरपळून निघाले. नाझींच्या जुलमी धोरणांमुळे छळामुळे प्रत्यक्षरित्या बळी पडलेल्या मुलांची संख्या अंदाजे १५ लाखांपेक्षा अधिक वर्तविली जाते. त्यात सुमारे १२ लक्ष ज्यु मुले, १० हजाराहून अधिक जिप्सी मुले आणि हजारो शारिरीक व मानसिक अपंगांनी विविध कारणांनी प्राण गमावले. जरी ज्यु मुले हे नाझींचे मुख्य लक्ष्य ठरली तरी शेकड्याने ज्युऐतर मुलं हिटलरच्या तथाकथित धोरणांची बळी ठरली. त्यांचे बालपण शुद्ध वं - सक्षम वंश, सक्षम समाज यांसारख्या अनेक आदर्शाना बळी ठरले. जी मुलं नाझींच्या तथाकथित आदर्शात बसत नव्हती त्यांना त्यांच्या कुटूंबापासून, समाजापासून अलग करून त्यांचे अत्यंत क्रुरपणे निर्दालन करण्यात आले. सक्षम-सुद्रुढ समाज बनवण्याच्या मार्गात अडसर ठरल्याने शेकड्याने शारीरिक व मानसिक द्रुष्ट्या अपंग मुलांची कत्तलकरण्यात आली. अशा अनौरस अक्षम मुलांपासून मुक्त समाज बनवण्याच्या हेतुने नाझींनी खास मोहीम आखली.


पहिल्या महायुद्धानंतर माजलेल्या आर्थिक व सामाजिक अनागोंदीचा फायदा उठवत नाझींनी स्वतःचे एक वेगळे साम्राज्य निर्माण केले. एका विशिष्ठ समाजाला आरोपी ठरवून तथाकथित आदर्शवाद त्यांनी जनमानसात रुजवला. जर्मन जनतेत त्यांनी दहशत निर्माण केली. अशा भेदरलेल्या समाजाचा तसेच गुप्त पोलीस यंत्रनेचा व नाझी आदर्शवादाने भारावलेल्या युवकांचा अक्षम मुलांना अलग करुन त्यांना मानसोपचार केंद्र म्हणवल्या जाणार्‍या कत्तलखान्यात धाडण्यासाठी वापर करण्यात आला. दुर्बलांचा आवाज दडपवण्यात अग्रेसर असलेल्या नाझींनी वैद्यकीय शास्त्रज्ञ तसेच मानसोपचार तज्ञ यांचा एक गट तयार केला व अशा अनौरस मुलांच्या निर्दालनाच्या योजनेची व त्याच्या अंमलबजावनीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली; हा गट तत्सम क्षेत्रात वर्चस्व राखून होता. हिटलरच्या आदर्शवादाने भारावलेल्या जुलमी नाझी विचारसारणीला दुर्बल मुले हकनाक बळी पडली; एकेकाळची आदर्श सामाजिक संस्थाने - शाळा, महाविद्यालये, दवाखाने काराग्रहे, छळछावन्या व कत्तल करण्याची केंद्रे बनली. अशा मुलांच्या पालकांचा आवाज दडपवून टाकण्यात आला; अशा निर्दालनास त्यांची जणू संमतीच आहे असे भासण्यात आले; अशा केसेसबद्द्ल न्यायालयात दाद मागण्यास मज्जाव करण्यात आला. एकेकाळी आदर्श म्हणून गणली गेलेली, व्यंग असलेल्या व्यक्तींना देखील समान वागणूक देणारी सर्व समावेशक सामाजिक व शैक्षणिक समानतावादी व्यवस्था हिटलरच्या नाझी विचारसारणीची बळी ठरली.

संदर्भ : Hitler's Unwanted Children

मंगळवार, २५ ऑगस्ट, २००९

थांबा 4G येतोय!

नुकतीच हीही बातमी वाचण्यात आली!
या बातमीनुसार मोटोरोला भारतात 4G सुविधा अजमावून पाहणार आहे. पण 3G पचवता-पचवता नाकी नऊ आलेल्या आपल्या दुरसंचार मंत्रालयाला व आपणाला 4G ( ज्यात Data Transfer Rate जवळपास 100Mbits/s म्हणजे BraodBand पेक्षा कितीतरी पट जास्त ) म्हणजे बाऊन्सरच असणार आहे. बा़की 4G च्या टेस्टींगसाठी frequency देण्याच्या करण्याबाबतीत मंत्रालयातर्फे काय धोरण राबविले जाणार ( कारण गुगलवरच पहा! ) याच्याबद्द्लचा विचार सोडून देऊन मी जालावर(अर्थातच गुगलवर) काही माहिती शोधली.
त्यावरून प्रकर्षाने जाणवले की आपल्या भारतात संशोधनाला मुळात ना सरकार प्रोत्साहन देते ना भारतीय कंपन्या त्यामुळे संशोधनात आपला देश मागा आहे. याउलट आपला ओढा आहे तो असलेले तंत्रज्ञान वापरण्यात व सेवा पुरवण्यात! पण याचा सर्वाधिक नफा होतो तो त्या देशांना ज्यांनी त्या उभारण्यात पुढाकार घेतला आहे. बाकी जास्त लिहीणे नको!

रविवार, २३ ऑगस्ट, २००९

गणपती बाप्पा मोरया!


सर्वांना
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!




गणपती बाप्पा मोरया
मंगलमुर्ती मोरया

गुरुवार, २० ऑगस्ट, २००९

राम राम गुगल अर्थ !

मित्रांनो आता आपणाला आपल्या शहराला अथवा घराला नकाशावर पहायचे असल्यास कोण्या गैर-भारतीय साईट वर जायची गरज नाही. कारण आता ही सुविधा आपल्या भारतीय तंत्रज्ञांनी स्वतः विकसित केलेली आहे आणि ती सध्याला प्रायोगिक तत्त्वावर भारतीय संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि तीही चांगल्या Quality मधे. ISRO(Indian Space Research Organization) ने आता आपले स्वत:चे Bhuvanbeta - भुवन या नावाने गुगल अर्थ हून चांगल्या प्रतीचे mapping application तयार केले आहे. तर मग एकदा तरी आजमावून पहा.




भुवनहून साभार


भुवनचे संकेतस्थळ : http://bhuvan.nrsc.gov.in/



अधिक माहितीसाठी भुवन तसेच विकीपेडिया पहा.

बुधवार, १९ ऑगस्ट, २००९

बंड


आज बंड करायचाय मला तुझ्याविरुद्ध
होय फोडून काढायचय तुला चाबकांनी
पिचलेल्या मना खुन करायचाय तुझा
पुन्हा एकदा द्यायचाय जन्म क्रांतीला
तोडून द्यायची आहेत सारी खोटी बंधने
पुन्हा उधळायचय मला बेभान माजून
घडवायचय नवीन जग पुन्हा एकदा
माणूस बनवायचाय मला या माकडांतून
शिकवायचीय त्याला पुन्हा एकदा नैतिकता
ठासून भरायचीय मला त्याच्यात हिंमत
पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी काळाच्यापुढे
बनवायचय त्याला सक्षम पोलादासारखं
पुन्हा एकदा बंड करण्यासाठी तुझ्याविरुद्ध

----बाळराजे

मंगळवार, १८ ऑगस्ट, २००९

सर

जेव्हा भर उन्हात पावसाची सर आली
पुन्हा एकदा आज तुझी आठवण आली
सरीसारखीच आली होतीस जीवनात
आठवतय तेव्हा देखील उन्हाळाच होता....इथे

बरसली होतीस, थैमान घातला होतास
अगदी पुरता वाहून गेलो होतो त्यात मी
कशी बाहूत कोसळली होतीस मनापासुन
आठवतय तेव्हा देखील तहानलेलाच होतो....आजच्यासारखा

गेलीस देखील आल्यासारखी तडकाफडकी
तेव्हा ही आला होता पूर इथे - माझ्या डोळ्यांत
पहायचस तरी मागे वळून तिथेच होतो मी
आठवतय का तेव्हा देखील जळतच होतो....सुर्यासारखा

येशील का पुन्हा एकदा, बरसशील का इथे
विझवशील का अखंड जळणारे हे जंगल
वसवशील का नंदनवन या ओसाड रानात
आठवतय तेव्हा देखील माळरानच होतं....आजच्यासारखं

----बाळराजे

रविवार, १६ ऑगस्ट, २००९

प्लिज जरा थांबशील का ?

प्लिज जरा थांबशील का?
नाही मी रागावणार नाही
पण चार शब्द ऐकूनच जा
अगदी शेवटचे...........

तु मुळात बरोबरच आहेस
चुकलो तो केवळ मीच
वेड्या मनाला कळलेच नाही
तुझ्या गालावरची ती खळी
अगदी चिरतरुण आहे ते

तुझे ते स्मित वाटले जणु
रणरणत्या ग्रिष्मात पाऊस
बरसतोय जणु माझ्याचसाठी
भिजलो त्यात चिंब अनेकदा

तेच तुला आज सांगितले
केवळ शब्दांतून..........

नाही म्हणालीस...ठीक आहे
पण तुला काही सांगायचे आहे
अगदी शेवटचेच...........

तुच होतीस एक शांत झुळूक
या करपलेल्या आयुष्यातली
तुच होतीस गर्द सावली
या ओसाड वाळवंटातली

तु नसणार यापुढे...
पण तुझ्या आठवणी...
राहतील अगदी चिरतरुण
तुझ्या गालावरच्या खळीसारख्या

सदैव राहशील तु मनात
एक कवडसा म्हणून...सुखाचा

आणि हो जाता जाता...
तुझा आजचा नकार...
असेल माझ्या आयुष्यातल्या
एका सुखद क्षणांचा अंत

एवढेच.........बस्स....

----बाळराजे

बुधवार, १२ ऑगस्ट, २००९

तो आणि ती - कथा पहिली

भाग -

तशी गोष्ट अगदीच सर्वसामान्य आहे. अगदी आपल्या शेजारीच घडणारी. एका 'तो' ची आणि एका 'ती' ची. ह्यात काही सिनेमातल्याप्रमाणे ना टिपीकल प्रेम जसे एक नायिका नायकाला रडत रडत सांगत असते - "xxx मैं तुम्हारे बिना नही जी सकती| " अथवा नायक जीव तोडून नायिकेला सांगत असतो - "xxx अगर तुम हाँ कह दो तो मैं तेरे लिए चाँद और तारे तोड लाऊंगा| ", ना ते झाडामागून चकरा मारत गाणे. ही अगदी common कथा आहे. ह्या कथेचा नायक एक सर्वसामान्य 'तो' असतो. आणि त्याचे एका 'ती' वर प्रेम असते, बस्स!
'तो' नुकताच H.S.C. पास झालेला. एक देखील मिसरुड न फुटलेला - पण तरीही लौकिकार्थाने तरुण झालेला! मार्क्स तसे बेताचेच पण का कोण जाणे त्याच्या आई-वडिलांच्या लेखी मात्र - "आमचा सोन्या ना खुप हुशार हो! त्याला ना बारावीत ७२ टक्के गुण मिळाले!!". आता तुम्हीच सांगा H.S.C. ला ७२% गुण घेणार्‍या आणि CET ला ९९ गुण(!......२०० पैकी हो!!) घेणार्‍या सोन्याला का कोणी हुशार म्हणेल? की कोणत्या 'इंजिनिअरिंग' कॉलेज मध्ये त्याचा Open मधुन नंबर लागेल? काय तर म्हणे 'आमचा सोन्या हुशार!'. पण बिचारे ते तरी काय करणार म्हणा आपलेच दात आणि आपलेच ओठ; झाकतात आपल्या पिलाला आपल्या पंखांखाली.
पण हा पठठ्या मात्र खुश! भरतो आपला CAP राऊंड्चा फॉर्म! पण बाप मात्र पुरता सावध असतो - अगदी पोराच्या नकळत त्याची अँडमिशन करुन देखील टाकतो - मॅनेजमेंट्मधुन!! हो अगदी स्वतःच्या आदर्शांना बाजुला सारुन... करणार काय, ज्या आदर्शांबरोबर स्वतःची माती झाली त्यांचा वारसा मुलाला देण्यास एक बाप म्हणुन त्याचे मन कच खात होतं..... सरळ काढलं राहत्या घरावर कर्ज आणि टाकलं शेवटी पोराला इंजिनिअरिंगला! एकडे पोरगं मात्र बघतय वाट CAP च्या Result ची!!
क्रमशः

शनिवार, ८ ऑगस्ट, २००९

वाळवंट !

आज पुन्हा एकदा तीच सुरुवात - तेच झोपेतुन उठणे, तीच पुन्हा अंघोळ, तेच परत जेवन, तीच दुपारची छानशी वामकुक्षी, तोच पुन्हा ४:०० चा चहा, तेच तेच तेच तेच ...... आणि फक्त तेच. आयुष्य जणू एक साचाच बनला आहे. कधी कल्पना देखील केली नव्हती की आयुष्य असे इतके सरळसोट बनेल!

तसे पाहता वरून केवळ एक नीरव शांतताच दिसत असते. परंतु आत कोठेतरी एक लाव्हा सतत उफाळत असतो - सदान्-कदा बंड पुकारत असतो, मनाच्या तटबंदीला रोज असंख्य बाभळी बोचत असतात; परंतु ना त्याच्या खुणा दिसतात ना दिसते अखंड वाहणारे लाल पाट! फक्त आतुन काही तरी जळत असते - सलत असते अखंड काहीतरी.... खुप आक्रोश करावासा वाटतो पण..... पण या आक्रंदनांचा ना आवाज येतो ना अश्रुधारा वाहतात. सर्व काही शांत्,फक्त वरून - आतून मात्र संग्राम अखंड संग्राम!! रोज क्षणोक्षणी हलाहल पिऊन ना मी नीलकंठ झालो ना नागराज!

प्रत्येक पाण्यात आकंठ बुडलो होय आकंठ - अगदी नाका - तोंडात पाणी जाईपर्यंत तरीही बाहेर पडलो तो केवळ कोरडा - कोरडा ठणठणीत! आयुष्य एक वाळवंट झाले आहे - तेही सदाहरित!! उडेल का इथे एक अल्लड नादान फुलपाखरु? उमलेल का कधी इथे एक सुंदरशी कळी? खरेच या वाळवंटाचा कधी होईल का बगीचा? की असेल ते एक छोटसंच ओएसिस - उरलेलं सगळ रन आणखी भाजुन काढणारं!


Powered By Blogger