सहज सुचलेले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सहज सुचलेले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २१ ऑक्टोबर, २००९

सुरूवात

कुठून सुरूवात करावी हेच सुचत नाही
कारण वाळवंटात रस्ता कधी दिसत नाही

तु रणातील मृगजळ
मी तहानलेलं हरीण
शोधतोय केव्हाचा तुला
पळतोय तुझ्याच कडे

अशी जाऊ नकोस लांब गं
फक्त तुझ्याचसाठी आलोय सोडून
ते दंडकारण्य, तो मायेचा झरा
तुझ्यासाठी त्यागलाय मी संसार सारा

दिसतेस तु मला अगदी समोरचं
दिसतोय आता शेवट पण, पण...
कुठून सुरूवात करावी हेच सुचत नाही
कारण वाळवंटात रस्ताच कधी दिसत नाही

शनिवार, २६ सप्टेंबर, २००९

राणीची झोप

आज का कोणास ठाऊक पण सहजच एक गोष्ट आठवली. अगदी लहान असताना ऐकलेली. आजोबांनी सांगितलेली - त्यांच्याच कुशीत बसून ऐकलेली. ती गोष्ट आहे राणीची झोप. आजोबा अशा काही प्रकारे गोष्टी सांगायचे की ऐकणारी आम्ही पोरं तल्लीन होऊन जात असू. वरवर पाहता अगदी साध्या होत्या त्या. मुळातच आजोबा खेड्याचे त्यामुळे गोष्टीही तश्याच अगदी साध्या. पण का कोण जाणे जसजसे आम्ही मोठे होत गेलो त्या गोष्टींचे असंख्य पैलू नजरेस येत गेले; एक एक गोष्ट जणु असंख्य पैलू पाडलेले हिरेच! त्या रात्री आजोबांनी सांगितलेली राणीची ती गोष्ट अजूनही आठवते.
एक राणी होती. राजाची सर्वांत लाडकी. पण राजा त्या राणीबद्द्ल खुप चिंतेत होता; कारण त्या राणीला रात्री झोपच येत नसे, जरा झोपण्याचा प्रयत्न केला की उशी किंवा गादी तिला टोचत असे. राजाने सर्व प्रयत्न केले पण काही निष्पन्न झाले नाही. न राजाला न प्रजेला कळत होते की राणीच्या त्रासाचे कारण तरी काय आहे. राजाने राणीसाठी खास मोरपिसी गादी बनवली पण पण ती देखील तिला टोचत होती. नंतर राजाने खास राणीसाठी गुलाबांची गादी बनवली पण त्या गादीच्या अगदी खालील बाजूस असलेल्या गुलाबाचा एक छोटासा काटा तिला टोचत होता. राजाला कळेना की काय करावे. एके दिवशी राजाच्या दरबारात एक विद्वान आले त्यांनी राजाला सांगितले की, "हे राजा मी तुझ्या राणीच्या त्रासाचे कारण हुडकून काढले आहे". हे ऐकून राजा खूप खुश झाला. पण त्या विद्वानाने एक अट घातली की तो जे सांगेल ते राजाने केले पाहिजे. यांस देखील राजा तयार झाला. ठरल्याप्रमाणे एके दिवशी राणीने वेशांतर केले. राणीला असे सांगण्यात आले की संध्याकाळ होताच पहारेकरी आपणांस महालात परत आणतील तोपर्यंत आपण प्रजेत राहून तिचे हाल-हवाल जाणून घ्यावे. राणी त्या दिवशी एकटीच राज्यात फिरली पण का कोणास ठाऊक पण रात्र होत आली परंतु महालातून कोणी तिला घेऊन जाण्यास आलेच नाही. राणी तशीच महालाकडे जात असता तिला एका म्हातारीने हटकले, विचारले "कुठं चाललीस पोरी?". राणीने सांगितले, "राजवाड्यात". म्हातारी म्हणाली, "राजवाडा तर संध्याकाळीच बंद झाला आणि सकाळशिवाय उघडणार नाही". हे ऐकून राणी फार चिंतेत पडली. ते पाहून म्हातारी म्हणाली, "असं कर पोरी आज माझ्या झोपडीत निज आणि उद्या सकाळी जा त्या राजवाड्यावर". राणीने होकार दिला. राणी तिच्या मागे चालू लागली. काही अंतरावरच म्हातारीची छोटीशी झोपडी होती. झोपडीत जाताच म्हातारीने तवा टाकून दोन गरम गरम भाकरी बनवल्या प्रत्येकीवर ठेच्याची चिमूट ठेवली एक स्वतः खाल्ली व एक राणीला दिली. दिवसभर हिंडल्याने राणीला देखील खूप भूक लागली होती त्यामु़ळे तिने ती ठेचा-भाकर आवडीने खाल्ली. नंतर म्हातारीने अंथरुण टाकले - अंथरुण कसले तर एक फाटकी गोधडी! राणी त्या रात्री त्या गोधडीवरच निजली. का कोण जाणे पण आज राणीला काही टोचत नव्हते. काही वेळातच राणीला गाढ झोप लागली. दुसर्‍या दिवशी सकाळी राणी परत राजवाड्यात गेली. तिने राजाला सर्व हकीकत सांगितली. राजाला अजून देखील कळत नव्हते की राणीच्या त्रासाचे कारण काय? त्याने राणीने सांगितलेली सर्व हकीकत त्या विद्वानाला सांगितली व त्याला याचे कारण विचारले. त्यावर विद्वान म्हणाला की, "राजन राणीला मुळात गादी टोचत नव्ह्ती तर तिला सभोवतालचे सुख टोचत होते".
खरे सांगायला गेल्यास त्याकाळी आम्हाला या गोष्टीचे ओ की ठो कळले नव्हते. पण आज ज्या ज्या वेळेस आजोबा आठवतात त्या त्या वेळेस त्यांच्या उबदार कुशीत बसून ऐकलेल्या गोष्टी आठवतात. पुर्ण आठवत असतीलच असे नाही तुटक-तुटकच आठवतात. पण त्या गोष्टींचे प्रत्येक पैलू दिवसागणिक नजरेस पडत जातात व त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळेस मनात एक नवीन घर करून जाते. आज आजोबा नाहीत पण त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्याकाळी न कळलेल्या व आज कळून चुकलेल्या अर्थांसकट आजोबांची तिच प्रेमळ, उबदार कूस देऊन जाते.

मंगळवार, २२ सप्टेंबर, २००९

'पट्टे' पुराण!


काल मी, राहूल आणि शंकर सलमान खानचा "वाँटेड" पहायला गेलो होतो. तिकीट वगैरे घेतल्यानंतर चित्रपट चालू होण्यास अजून बराच वेळ असल्याने आम्ही बाहेरच गप्पा मारत थांबलो होतो.
"तुला एक गंमत सांगायचीय !" - शंकर अचानक मध्येच म्हणाला.
तेव्हढ्यात राहूलने त्याच्यावर दोन-तीन स्तुतीसुमने(!) उधळली.
"काय भानगड काय आहे ?" - मी
"काल राहूलने बेल्ट घेतलाय - नवीन !"
"मग" - मी
आता तर राहूल त्याच्यावर धावूनच गेला. वाटले, खरीच काहीतरी भानगड आहे.
एकतर आम्हाला दुसर्‍यांच्या भानगडीत खुपच 'इंट्रेष्ट' आणि त्यात ती जर राहूलची असेल तर 'बात छोड'!
मी राहूलला आवरले.
शंकरने सुरुवात केली - "काल राहूलने नवीन बेल्ट खरेदी केलाय !"
"मग" - मी
"राहुल्या दाखव बे !" - शंकर
राहूलने सुटलेल्या पोटासहीत त्याचा तो 'नवीन' पट्टा दाखवला.
"चांगला तर आहे की ?" - मी
"गेस कर किंमत काय असेल ?" - शंकर
मी - "असेल ६०-७० रुपये..."
शंकरने डोक्याला हात लावला!
"मग पन्नास !" - मी
राहूल गालातल्या गालात हसला!!
"का काय झाले ?" - मी
"हट! चाळीसचा आहे तो !!" - इति शंकर
"मग...." - मी
शंकर - "काल मी आणि राहूल्या त्याच्यासाठी पट्टा खरेदी करायला गेलेलो होतो. ह्याने तब्ब्ल १० - १५ पट्टे पाहिल्यानंतर हा घेतला. त्याने किंमत सांगितली '४० रू.' आणि राहूल्या 'पन्नास रूपयाला देत असाल तर घेतो!' दुकानदार - 'जमत नाही साहेब चाळीसला घ्यायचा असेल तर घ्या!' पण हा काही पन्नाशी सोडेना आणि तो चाळीशी! हा मुर्ख आणि तो महामुर्ख!! तरी मी सांगितलं 'राहूल्या तीसला माग बे ......!' हा मात्र त्याच्याशी हुज्जत घालू लागला. थोड्या वेळाने त्या दुकानदारचीच ट्युब पेटली; त्यानं शेवटी ह्याला पन्न्न्नास रूपयाला पट्टा विकला आणि जाताना आम्हाला न विसरता म्हणाला 'या परत!!' "
बाकीचे ऐकण्याआधीच राहूल चित्रपटगृहात शिरला!
मागून शंकर ओरडत होता - "द ग्रेट बारगेनर, राहूल महाराज की..........."
"जय!" - मी

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २००९

कारण....

हरलेली लढाई
आज पुन्हा लढणार आहे

गंजलेली तलवार
आज पुन्हा म्यानातून काढणार आहे

तिचे
त्याचे
आपल्यांचे
परक्यांचे
माणसांचे
आणि 'जना'वरांचे

शब्दांचे वार
नि:शब्द वार
कोमल वार
कठोर वार
सरळ वार
वाकडे वार
नुसतेच वार
पण वार

आज पुन्हा परतवणार आहे
कारण....
हरलेली लढाई
आज पुन्हा लढणार आहे

मंगळवार, २५ ऑगस्ट, २००९

थांबा 4G येतोय!

नुकतीच हीही बातमी वाचण्यात आली!
या बातमीनुसार मोटोरोला भारतात 4G सुविधा अजमावून पाहणार आहे. पण 3G पचवता-पचवता नाकी नऊ आलेल्या आपल्या दुरसंचार मंत्रालयाला व आपणाला 4G ( ज्यात Data Transfer Rate जवळपास 100Mbits/s म्हणजे BraodBand पेक्षा कितीतरी पट जास्त ) म्हणजे बाऊन्सरच असणार आहे. बा़की 4G च्या टेस्टींगसाठी frequency देण्याच्या करण्याबाबतीत मंत्रालयातर्फे काय धोरण राबविले जाणार ( कारण गुगलवरच पहा! ) याच्याबद्द्लचा विचार सोडून देऊन मी जालावर(अर्थातच गुगलवर) काही माहिती शोधली.
त्यावरून प्रकर्षाने जाणवले की आपल्या भारतात संशोधनाला मुळात ना सरकार प्रोत्साहन देते ना भारतीय कंपन्या त्यामुळे संशोधनात आपला देश मागा आहे. याउलट आपला ओढा आहे तो असलेले तंत्रज्ञान वापरण्यात व सेवा पुरवण्यात! पण याचा सर्वाधिक नफा होतो तो त्या देशांना ज्यांनी त्या उभारण्यात पुढाकार घेतला आहे. बाकी जास्त लिहीणे नको!

गुरुवार, २० ऑगस्ट, २००९

राम राम गुगल अर्थ !

मित्रांनो आता आपणाला आपल्या शहराला अथवा घराला नकाशावर पहायचे असल्यास कोण्या गैर-भारतीय साईट वर जायची गरज नाही. कारण आता ही सुविधा आपल्या भारतीय तंत्रज्ञांनी स्वतः विकसित केलेली आहे आणि ती सध्याला प्रायोगिक तत्त्वावर भारतीय संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि तीही चांगल्या Quality मधे. ISRO(Indian Space Research Organization) ने आता आपले स्वत:चे Bhuvanbeta - भुवन या नावाने गुगल अर्थ हून चांगल्या प्रतीचे mapping application तयार केले आहे. तर मग एकदा तरी आजमावून पहा.




भुवनहून साभार


भुवनचे संकेतस्थळ : http://bhuvan.nrsc.gov.in/



अधिक माहितीसाठी भुवन तसेच विकीपेडिया पहा.

शनिवार, ८ ऑगस्ट, २००९

वाळवंट !

आज पुन्हा एकदा तीच सुरुवात - तेच झोपेतुन उठणे, तीच पुन्हा अंघोळ, तेच परत जेवन, तीच दुपारची छानशी वामकुक्षी, तोच पुन्हा ४:०० चा चहा, तेच तेच तेच तेच ...... आणि फक्त तेच. आयुष्य जणू एक साचाच बनला आहे. कधी कल्पना देखील केली नव्हती की आयुष्य असे इतके सरळसोट बनेल!

तसे पाहता वरून केवळ एक नीरव शांतताच दिसत असते. परंतु आत कोठेतरी एक लाव्हा सतत उफाळत असतो - सदान्-कदा बंड पुकारत असतो, मनाच्या तटबंदीला रोज असंख्य बाभळी बोचत असतात; परंतु ना त्याच्या खुणा दिसतात ना दिसते अखंड वाहणारे लाल पाट! फक्त आतुन काही तरी जळत असते - सलत असते अखंड काहीतरी.... खुप आक्रोश करावासा वाटतो पण..... पण या आक्रंदनांचा ना आवाज येतो ना अश्रुधारा वाहतात. सर्व काही शांत्,फक्त वरून - आतून मात्र संग्राम अखंड संग्राम!! रोज क्षणोक्षणी हलाहल पिऊन ना मी नीलकंठ झालो ना नागराज!

प्रत्येक पाण्यात आकंठ बुडलो होय आकंठ - अगदी नाका - तोंडात पाणी जाईपर्यंत तरीही बाहेर पडलो तो केवळ कोरडा - कोरडा ठणठणीत! आयुष्य एक वाळवंट झाले आहे - तेही सदाहरित!! उडेल का इथे एक अल्लड नादान फुलपाखरु? उमलेल का कधी इथे एक सुंदरशी कळी? खरेच या वाळवंटाचा कधी होईल का बगीचा? की असेल ते एक छोटसंच ओएसिस - उरलेलं सगळ रन आणखी भाजुन काढणारं!


Powered By Blogger